गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा राष्ट्रीय बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केली. त्यामुळे बँकांच्या शेअर्समध्ये थोडीशी उलाढाल वाढली असून, ज्या बँकांचे अस्तित्व कायम रहाणार आहे, त्यांच्या शेअर्सचे भाव हळूहळू वाढत जातील. त्यामुळे अशा बँकांच्या शेअर्समधील गुंतवणूक लाभदायी ठरावी.... त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव पटवर्धन यांच्याकडून...
.......
गेल्या आठवड्यात काही राष्ट्रीय बँकांचे विलिनीकरण झाले. बँक ऑफ महाराष्ट्र प्रादेशिक बँक असल्यामुळे तिचे अस्तित्व कायम राहिले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरचा भाव सध्या १२ रुपये ५५ पैसे इतका आहे. वर्षभरात तो २५ टक्के वर जावा. अपोलो टायर्स कंपनीचा शेअर सध्या १७२ रुपयांपर्यंत वाढला आहे. पुढील सहा महिन्यांत तो आणखी २५ टक्के तरी वाढावा. सध्या त्यात २० लाख शेअर्सचा व्यवहार होत आहे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर ७४५ रुपये दराला घ्यायला आकर्षक वाटतो.
बँकांच्या विलिनीकरणामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांच्या स्वरूपात काहीही बदल होणार नाही.
सिंडिकेट बँकेचे विलिनीकरण कॅनरा बँकेत, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकरण होईल. इंडियन बँकेत अलाहाबाद बँक विलीन होईल. ज्या बँकांचे अस्तित्व कायम राहणार आहे, त्यांच्या शेअर्सचे भाव हळूहळू वाढत जातील.
येस बँकेचा शेअर आता ६० रुपयांपर्यंत घसरला आहे. तो आणखी खाली घसरेपर्यंत गुंतवणुकीची घाई करू नये. रॅमको सिमेंट कंपनीचा शेअरही सध्या गुंतवणुकीसाठी बरा वाटतो. या कंपनीचे शेअरगणिक उपार्जन सध्या २१ रुपये आहे. मार्च २०२१मध्ये ते ३२ रुपये व्हावे असा अंदाज आहे. पावसाळ्यात सिमेंटचे भाव उतरत असतात. कारण महामार्गांची व घरांची कामे थंडावलेली असतात. त्यामुळे सिमेंटचे शेअर्स सध्या कमी भावात उपलब्ध असतात.
सिंगल ब्रँड किरकोळ दुकानांना (रिटेल) स्थानिक पातळीवर ३० टक्क्यांपर्यंत खरेदी केल्यास विदेशी कंपन्या इथे भांडवल घालू शकतील. डाबर इंडिया, मॅरिको, कोलगेट या कंपन्यांच्या शेअरमध्ये माफक प्रमाणात गुंतवणूक करायला हरकत नाही.
पुढील दोन वर्षांत ७५ नव्या शहरांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी ईशान्य भारतात, तसेच डोंगराळ राज्यांत केंद्र सरकार ५० टक्के खर्च करेल. १५ हजार ७०० विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांत प्रवेश मिळेल. त्याचा फायदा आज ना उद्या औषध कंपन्यांना होईल. कोळसा क्षेत्रात १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली गेली आहे.
बजाज फायनान्स कंपनीचा शेअर सध्या तीन हजार ३३२ रुपयांपर्यंत चढला आहे. तो पुन्हा तीन हजार ते ३१०० रुपयांच्या पातळीत आला तर घेण्याजोगा ठरेल.
के. पी. आर मिल्स हा शेअर ५८६ रुपयांना उपलब्ध आहे. तो अजून २५ टक्के वाढू शकेल. सध्याच्या भावाला किं./उ. गुणोत्तर ११.९ पट आहे. ‘सिएट’चा २०१९च्या तिमाहीचा नफा १५ टक्क्यांनी वाढला आहे. सिएट व बाळकृष्ण इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही.
- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक शेअर बाजार या विषयातील तज्ज्ञ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)
(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)